
शिरपूर, ता. ८ : ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे प्रथमच जिल्हाभर तालुकास्तरीय टॅलेंट सर्च मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर उत्साहात झाला.
धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते टॅलेंट सर्च उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ सल्लागार प्रकाश पाटील, ॲड. प्रमोद क्षिरे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, जिल्हा असोसिएशनचे सचिव प्रितेश पटेल, निवड समिती सदस्य लहू पाटील (ज्यु.) व राजेंद्र बारे उपस्थित होते.
धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना शोधून त्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण देण्याची योजना या मोहिमेद्वारे राबविण्यात येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना भूपेशभाई पटेल म्हणाले, ‘‘धुळे जिल्ह्यात क्रिकेटची गुणवत्ता असलेल्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. मात्र योग्य मार्गदर्शन व संधीच्या अभावामुळे अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे येऊ शकत नाहीत. टॅलेंट सर्चच्या माध्यमातून अशा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल.’’
या उपक्रमाला शिरपूर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातून सुमारे २२५ खेळाडूंनी नोंदणी केली असून पहिल्या दिवशी १४ व १६ वर्षांखालील १२६ खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. उर्वरित १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील, खुला गट तसेच महिला खेळाडूंच्या चाचण्या सोमवारी होणार आहेत.
कडक उन्हाची पर्वा न करता खेळाडू व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उपक्रमाला प्रतिसाद दिला. पालकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले.
दरम्यान, टॅलेंट सर्च मोहिमेअंतर्गत १० व ११ जून रोजी एस.व्ही.के.एम. स्कूल, धुळे, १३ जून रोजी हस्ती पब्लिक स्कूल, दोंडाईचा, १४ जून रोजी व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूल, शिंदखेडा आणि १९ ते २० जूनदरम्यान तालुका क्रीडा संकुल, साक्री येथे खेळाडूंच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
ग्रामीण व आदिवासी भागातील क्रिकेट प्रतिभेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही मोहीम जिल्ह्यातील क्रिकेट विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे मत क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.
