शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एकाच रात्रीत दोन गावांमध्ये चार धाडसी घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आमोदे गावात एक तर बलकुवे गावात तीन घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत चोरी केली. घरफोड्यांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांतील अनेक घरफोडी प्रकरणांचा अद्याप उलगडा झालेला नसताना पुन्हा एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील कार्यवाही शहर पोलीस करीत आहेत.
